हडपसर – केंद्र सरकारच्या कृषि विषयक धोरणाविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरिता पुकारण्यात आलेल्या भारत बंदला हडपसर, मांजरी परिसरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.
महाविकास आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीव्यतिरिक्त आंदोलन सर्वत्र शांततेत झाले. हडपसर परिसरात बंदचा परिणाम पाहायला मिळाला. भाजीपाला मंडईत कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे सय्यदनगर, चिंतामणी नगर व हडपसर गाव येथे दुपारपर्यंत सर्व दुकानदारांकडून या बंदला प्रतिसाद देण्यात आला.
केंद्र सरकारने आणलेले कृषि धोरण हे भांडवलशाहीला फायदेशीर आहे. सर्वसामान्य शेतकरी यातून संपणार आहे. भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव नाही. कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. सर्व प्रकारच्या मदतीतून उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.
– बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री, कॉंग्रेस
बळीराजाचा बळी देण्याचे काम या कृषि धोरणातून भाजप सरकार करत आहे. काबाडकष्ट करून आपल्याला जगवणाऱ्या शेतकरी राजाला संपवण्याचे काम कृषि धोरणातून होणार आहे. शेतकरी हा देशाच्या उन्नतीचा कणा आहे, त्यांच्या सोबत आम्ही नेहमीच राहणार आहोत.
– महादेव बाबर, माजी आमदार, शिवसेना
शेतकरी विरोधातील काळे कायदे रद्द करावेत. अन्यथा, भविष्यात संघर्ष करून सरकारला वठणीवर आणावे लागेल. शेतकऱ्यांविषयी भाजपा आयटीसेलकडून सोशल मीडियात जे गैरसमज पसरविले जात आहेत. ते त्वरित थाबवावे. अन्यथा, प्रखर अंदोलन उभे करू.
– निलेश मगर, माजी उपमहापौर , राष्ट्रवादी कॉंग्रेस
शेतकरी जगला तरच देश जगेल. या लढाईत शेतकरी एकटा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यासाठी आज रस्त्यावर येऊन मोदी सरकारला हाच संदेश दिला आहे.
फारुक इनामदार, माजी नगरसेवक, राष्ट्रवादीकॉंग्रेस
शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेध व्यक्त करीत आज शेतकऱ्यांन पाठिंबा म्हणून आम्ही आमचे सर्व भाजी मार्केट शंभर टक्के बंद ठेवले आहे. शेतकरी सुखी राहणार असेल तर आम्ही सुखी राहू. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा आहे.
बाळासाहेब भिसे, अध्यक्ष, व्यापारी संघटना हडपसर