ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 था, ओवी 105 माऊली येथे कर्माने आणि ज्ञानाने परिपूर्ण पुरुषाविषयी आपले विचार प्रतिपादीत करतात.
ज्या पुरुषाच्या अंतःकरणात कर्माविषयी थोडादेखील तिरस्कार आणि कंटाळा नसतो आणि मनात कर्मापासून प्राप्त होणाऱ्या फलाविषयी काहीच अपेक्षा नसते आणि हे कर्म मी करीन किंवा आरंभिलेले कर्म सिद्धीला नेईन या कल्पनेनेसुद्धा ज्याचे मन विटाळले गेलेले नाही.
ज्ञानरूपी अग्नीच्या मदतीने ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्याचे रूप धारण केलेला प्रत्यक्ष ब्रह्मच आहे, असे तू समज. येथे माऊलींनी ज्ञानाला अग्नीची उपमा दिलेली आहे. कारण अग्नीमध्ये सर्वकाही जळून भस्म होऊन नष्ट होते.
काहीही शिल्लक राहात नाही. असेच काही पंडित विद्वान असतात की ज्याची सर्व कर्म फलेच्छारहित आणि कर्तृत्वाभिमानरहित असतात. त्यांची तुलना माऊली प्रत्यक्ष ब्रह्माशी करून त्यांना सर्वोच्च स्थान प्रदान करतात.
================================