मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. राज ठाकरे यांनी टोल नाके बघावेत. त्यांनी सरकारला शहाणपण शिकवू नये. माझ्यावर टीका करण्याएवढे ते मोठे नाहीत. त्यांना माझ्यापुढे वन टू वन येऊ द्या. त्यानंतर मी सांगतो, असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे कोणत्या लॉ कॉलेजमध्ये शिकलेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
मनसेने काही दिवसांपूर्वी सरकारतर्फे गुणरत्न सदावर्ते यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेवर सरकार महिन्याकाठी २० लाख रुपये खर्च करत आहे. ते सरकारचे जावई आहेत का? असा सवाल त्यांनी यासंबंधी केला होता. सदावर्ते शनिवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलत असताना पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे मालक झालेत काय? त्यांचे कर्तृत्व काय? राज ठाकरेंची पार्श्वभूमी काय? असे बोलायचे झाले, तर मी खूप काही बोलू शकतो. पण आज तो विषय नाही. आज ती वेळही नाही.
जरांगेंवर देखील टीका
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. तसेच मराठा तरुणांना पुस्तकांचे वाचन करण्याचाही सल्ला दिला. जरांगे पाटील यांचे ज्ञान काय आहे हे मला माहिती नाही. ते कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे? कोणती याचिका केलेली आहे? मराठा समाजातील विद्वान माणसांनी बोलले तर समजू शकतो, असे सदावर्ते म्हणाले.