सातारा (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसहिंतेतील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ही आचारसंहिता दि. 16 मार्चपासून लागू झाली आहे.
निवडणूक काळात काय करावे आणि काय करू नये, यासंबंधीची ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या काळात काय करावे याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेले कार्यक्रम पुढे सुरू राहू शकतात. पूर, दुष्काळ, रोगराई आणि इतर नैसर्गिक आपत्तींनी बाधित लोकांना मदत, पुनर्वसनाचे उपाय करता येतील.
गंभीर आजारी व्यक्तींना रोख किंवा वैद्यकीय सुविधांचे अनुदान योग्य मंजुरीसह सुरू राहील. मैदानासारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्ष, प्रतिस्पर्धी उमेदवारांना निष्पक्षपातीपणे उपलब्ध असणे आवश्यक आहे, जेणेकरून समान संधी सुनिश्चित होईल. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांवरील टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, भूतकाळातील रेकॉर्ड आणि कार्याशी संबंधित असावी.
प्रत्येक व्यक्तीचा शांततापूर्ण आणि घरगुती जीवनाचा हक्क पूर्णपणे संरक्षित केला गेला पाहिजे. स्थानिक पोलीस अधिकार्यांना सभांची ठिकाणे आणि वेळा यांची माहिती वेळेत देण्यात यावी. सभांसाठी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या पाहिजेत.
सभांच्या ठिकाणी मर्यादा घालणारे किंवा प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्यास, त्यांचा पूर्ण आदर करावा. सूट हवी असल्यास अर्ज करणे आणि वेळेत सवलत मिळवणे आवश्यक आहे. सभांसाठी ध्वनिक्षेपक किंवा इतर सुविधा वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.
सभेत अडथळा आणणार्या किंवा अव्यवस्था निर्माण करणार्यांवरील कारवाईसाठी पोलिसांची मदत घ्यावी. कोणतीही मिरवणूक सुरू होण्याची वेळ, ठिकाण, मार्ग आणि मिरवणूक संपण्याचे ठिकाण आणि वेळ निश्चित करून, पोलीस अधिकार्यांकडून आगाऊ परवनगी घ्यावी. ज्या परिसरातून मिरवणूक काढायची आहे, तेथे प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत का याची खात्री करून, त्यांचे पूर्ण पालन करावे. वाहतूक नियम आणि इतर निर्बंधांचे अनुपालन करावे.
वाहतुकीस अडथळा होणार नाही, असा मिरवणुकीचा मार्ग असावा. मतदान शांततेत आणि सुव्यवस्थित होण्यासाठी निवडणूक अधिकार्यांना सहकार्य करावे. सर्व कामगारांनी बॅज किंवा ओळखपत्रे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. मतदाराला जारी केलेती अकार्यालयीन ओळखचिठ्ठी, साध्या (पांढर्या) कागदावर असावीत.
त्यात कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव नसावे. प्रचार कालावधीत आणि मतदाना दिवशी वाहने चालवण्यावरील निर्बंधीचे पालन करावे. मतदार, उमेदवार आणि त्यांचे पोलिंग एजंट वगळता, केवळ निवडणूक आयोगाचे विशिष्ट वैध प्राधिकार पत्र असलेल्या व्यक्तीच मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करू शकतात. उच्च पदावरील कोणतेही अधिकारी, उदाहरणार्थ मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किवा आमदार या अटींपासून मुक्त नाहीत.
निवडणूक आयोजित करण्याबाबत तक्रारी किंवा समस्या असल्यास आयोग/रिटर्निंग ऑफिसर/झोनल/सेक्टर यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकार्यांचे निर्देश वा सूचना निवडणुकीशी संबंधित सर्व बाबींमध्ये पाळल्या जाव्यात. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही मतदार किवा उमेदवार किंवा उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी नसल्यास मतदारसंघ सोडावा.
काय करू नये याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. सत्ताधारी पक्ष वा शासनाच्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे. कोणताही मंत्री उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल, तर त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही.
शासकीय कामाची, निवडणूक मोहिमेची सरमिसळ निवडणूक प्रचारकार्यासोबत करू नये. मतदारांना पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय व समूह भावनांना आवाहन करू नये. वेगवेगळ्या जाती, समूह, धार्मिक किंवा भाषिक गटांमध्ये मतभेद वाढतील, द्वेष किंवा तणाव निर्माण करील, असे कृत्य करू नये. प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या, खाजगी आयुष्याच्या पैलूवर टीका करण्याची परवानगी नाही.
प्रतिस्पर्धी पक्ष, कार्यकर्त्यांवर सत्यापित नसलेले आरोप आणि विपर्यस्त माहितीच्या आधारावर टीकाटिप्पणी करू नये. मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत, निवडणूक प्रचाराची जागा म्हणून करू नये.
मतदारांना लाच देणे, गैरवाजवी दडपण, धाकदपटशा दाखवणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधी 48 तास सार्वजनिक सभा घेणे, मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे, यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणार्या गोष्टींना मनाई आहे.
लोकांच्या मतांचा किंवा कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरांसमोर निदर्शन करणे किंवा धरणे धरणे यांचा अवलंब केला जाणार नाही. कायद्यांच्या अधीन राहून, कोणाचीही जमीन, इमारत, आवराची भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटवण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी वापर करता येणार नाही.
प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुकांमध्ये गोंधळ निर्माण करू नये. ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी पक्षांच्या सभा असतील, तेथून मिरवणूक नेऊ नयेत. क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून दुरुपयोग केला जाऊ शकतो, अशा वस्तू मिरवणुकीतील लोकांनी जवळ बाळगू नयेत. प्रतिस्पर्धी पक्ष व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करू नयेत.
मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किवा मतदान कक्षाजवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्याचे प्रदर्शन करू नये. ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 नंतर आणि संबंधित अधिकार्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय करू नये. प्राधिकार्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय सभा आणि मिरवणुकांमध्ये ध्वनिवर्धकाचा वापर करू नये.
प्रचारसभा, मिरवणुका रात्री 10 नंतर सुरू ठेवण्याची परवानगी देऊ नये. त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, संबंधित जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे ज्ञान, हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम, परीक्षांचे दिवस यांसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल. निवडणुकीच्या काळात मद्यांचे वाटप करता येणार नाही.
ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याने, तिला सरकारी सुरक्षा पुरवण्यात आली असेल, तर अशा व्यक्तीला मतदानाच्या दिवशी, तिच्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह मतदान केंद्राच्या परिसरात, 100 मीटर्सच्या आत प्रवेश करता येणार नाही.
अशा व्यक्तीला मतदाना दिवशी सुरक्षा कर्मचारी वर्गासह मतदारसंघात फिरता येणार नाही. ज्या व्यक्तीला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षारक्षक असतील, तर त्या व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नाही.