नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज गहू आणि सहा रब्बी पिकांच्या किमान हमी भाव क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ केली आणि हा हमीभाव प्रति क्विंटल 1,975 रुपये करण्यात आला आहे.
देशभरात शेतकऱ्यांकडून होत असलेल्या लागवडीच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी हा किमान हमी भाव वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लोकसभेत सांगितले.
संसदेमध्ये कृषीविषयक दोन महत्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर पंजाब, हरियाणातील शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारने किमान हमी भावामध्ये वाढ केली आहे.
या विधेयकांमुळे देशातील शेतकऱ्यांना वितरणाचे स्वातंत्र्य आणि शेतमालाला अधिक सरस किंमत मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी किमान हमी भावाची घोषणा केल्यानंतर कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी सभात्याग केला.