नवी दिल्ली – साधारणपणे मार्च 2020 पासून म्हनजे ऐन आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या दरम्यानच करोनाव्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड19 चा प्रादुर्भाव वाढला आणि एकामागून एक क्षेत्रे लॉकडाऊनमुळे ठप्प झाल्याने, मागील सहा महिन्यांत आर्थिक उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली होती. केवळ वैद्यकीय व्यवसाय आणि जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारात थोडीफार हालचाल होती. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग आणि जीडीपी, अन्य देशांप्रमाणे भारताचाही घसरला होता.
मात्र, सप्टेंबरमध्ये “अनलॉक’ प्रक्रिया सुरु झाल्याने अनेक व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरु झाले आणि बाजारीतल मरगळ दूर झाली. त्यामुळे याच महिन्यापासून आता आर्थिक स्थिती सावरण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु झाली आहे. बाजारात सर्वच प्रकारच्या वस्तूंची मागणी व व्यावसायिक घडामोडी वाढल्यामुळे कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून सावरण्यास अर्थव्यवस्थेला मदत झाली आहे. निर्यातीसह आठपैकी पाच संकेतकांनी सप्टेंबरमध्ये चांगली सुधारणा दर्शविली आहे. उरलेले तीन संकेतक स्थिर असल्याचे दिसून आले आहेत.
अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया (“अनलॉक’) सुरू केल्यानंतर मागणीत वाढ झाली आहे. त्याचा लाभ अर्थव्यवस्थेला झाला आहे. मागणी वाढल्यामुळे रिकामे झालेले साठे भरून काढण्यासाठी वस्तूंचे उत्पादन कंपन्यांकडून वाढविण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून आगामी काही महिन्यांत व्यावसायिक घडामोडी वेगवान होतील.
अर्थव्यवस्थेतील ही सुधारणा पुरेशी नसली तरी अर्थव्यवस्था पूर्णपणे जागेवर येण्यास अद्याप काही काळ जावा लागणार आहे. तरिही आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे गाडे चालू वित्त वर्षात रुळावर येण्यासारखी स्थिती अजून तरी दिसत नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) 10 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, असे रिझर्व्ह बॅंकेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
आर्थिक घडामोडींचा कणा असलेल्या सेवाक्षेत्रात चांगली सुधारणा दिसून आली आहे. या क्षेत्राचा मुख्य निर्देशांक 49.2 अंकांवर गेला. ऑगस्टमध्ये तो 41.8 अंकांवर होता. एप्रिलमध्ये तो अवघा 5.4 अंकांवर होता. याचा विचार करता, मंदगतीने का होईना, आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दिशेने या दसरा-दिवाळीच्या दिवसांत श्रीगणेशा झाला आहे.