नगर – जिल्ह्यातील बारा तालुक्यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदीत हे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, श्रीगोंदा व जामखेड तालुक्यातील भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याच्या पाणी पातळीच्या अद्ययावत नोंदी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत एका वर्षात किमान जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर अशा महिन्यांमध्ये घेतल्या जातात. त्यानुसार जानेवारी महिन्यातील भूजल पातळी मोजण्याचे कामही पूर्ण झाले आहे. पातळी पाहणीचे काम व्यापक स्वरुपात व अचूक व्हावे, यासाठी यंदा जिल्ह्यातील तब्बल एक हजार 527 निरीक्षण विहिरींतील पाणी पातळी मोजण्यात आली. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अकोले, कर्जत, कोपरगाव, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव व श्रीरामपूर या बारा तालुक्यांमध्ये भूजल पातळीत समाधानकारक वाढ दिसून
येत आहे.
मागील वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. यामुळेच पाणी पातळीत वाढ झाल्याचा अंदाजही या भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
जानेवारीतील आकडेवारीनुसार बारा तालुक्यांमधील भूजल पातळीत वाढ झाली असली, तरी जामखेड व श्रीगोंदा या दोन तालुक्यांमध्ये मात्र काही प्रमाणात पाणी पातळी घटली आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरीचा अभ्यास करता जामखेड तालुक्यातील पाणी पातळी 0.68 मीटरने व श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पातळी 0.87 मीटरने कमी झाली आहे.
अकोले तालुक्याची पाणीपातळी 0.28 मीटरने,कर्जतची 1.41, कोपरगाव 0.90, नगर 1.93,नेवासा 1.26, पारनेर 1.51, पाथर्डी 1.55, राहाता 1.95, राहुरी 1.17, संगमनेर 1.22,शेवगाव 1.57 तर,श्रीरामपूर तालुक्याची पाणीपातळी 1.44 मीटरने वाढली आहे. दरम्यान, सध्याची भूजल पातळीची परिस्थिती पाहता जिल्ह्यात येत्या 31 मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.