अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
बदली सुट्टी, वेतनवाढ याबाबत प्रशासकीय पातळीवर
खलबतेपिंपरी :शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कर्मचाऱ्यांचा “वीकएण्ड’ आता आनंददायी ठरण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. पाच दिवसांचा आठवडा निर्णयाची अंमलबजावणी करण्यास तांत्रिक अडथळे निर्माण झाले असून यातून मार्ग काढण्यासाठी पालिका पातळीवर खलबते सुरू झाली आहे. जे विभाग अत्यावश्यक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. शिवाय शासनाच्या “जीआर’मध्येही त्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय 12 फेब्रुवारीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतचा शासन निर्णय आज (सोमवारी) राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, दर शनिवारी आणि रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. त्यासाठी सोमवार ते शुक्रवार शासकीय कार्यालयांची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार कार्यालयांची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते 6.15 अशी असेल. शासकीय कार्यालयांतील शिपायांना मात्र अर्धा तास आधिक वेळ काम करावे लागणार आहे. त्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी असणार आहे. संबंधित कार्यालयीन वेळेत दुपारी 1 ते 2 या कालावधीत अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.