व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क माफ
नुकसानग्रस्त तालुक्यांसाठी मोठा निर्णय
पुणे -दुष्काळ परिस्थिती व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे तंत्रशिक्षणच्या सर्व पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे, त्यांना परीक्षा शुल्क संबंधित संस्थेमार्फत भरण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ होणार आहे. मात्र, राज्य शासनाने नुकसानग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या भागातील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. अंबेजोगाई आणि परंडा या दोन तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली तसेच चक्रीवादळामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यातील पिकांचे व बहुवर्षीय पिकांचे नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार कार्यवाही करावी, असे आदेश तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिले आहेत.
शुल्कमाफीची लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहील. तसेच, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेखालील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना 50 टक्के रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येते. या योजनेखाली परीक्षा शुल्काच्या केवळ 50 टक्के इतकी रक्कम माफ करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रुपये 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना 100 टक्के परीक्षा शुल्काची रक्कम माफ करावी, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.