पुणे: अन्नधान्य, भाजीपाला, दूध आदी जीवनाश्यक वस्तूंची वाहतुकीस परवानगी आहे. या वस्तूंची वाहतूक करताना वाहनचालकाने गाडीवर अत्यावश्यक सेवा असा फलक लावावा. त्याचबरोबर तहसीलदार यांच्यांकडून परवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तू तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनधारकाला पोलीस प्रतिबंध करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वाहनांची अडवणूक केल्यास अशा वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे साठेबाजी वाढू शकते तसेच किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस कोणतीही बंदी घालण्यात आलेली नसल्या चे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न
लॉकडाउनच्या या 21 दिवसांत आपल्या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत करू शकते. कोणत्याही जीवनावश्यक वस्तू म्हणजे औषधी, भाजीपाला, अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
या वाहनांनाच परवानगी
* भाजीपाला, फळे, दूध आदींची वाहतूक करणारी वाहने
* अन्नधान्याची वाहतूक करणारी वाहने
* दूध व दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक करणारी वाहने
* औषधे, उपकरणे
* पशुखाद्य
* गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांची वाहतूक करणारी वाहने