पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सादा जीवन उच्च विचार, मानव जीवन का शृंगार… कैसे बदले जीवन धारा, प्रेक्षाध्यान साधना द्वारा… संयम ही जीवन है… अशा प्रकारच्या आशयाचे विविध संदेशाचे फलक घेत शालेय विद्यार्थी, युवक- युवतींसह महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने अभिवादन यात्रेत सहभाग घेतला आणि जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे पुण्यात स्वागत केले.
नेपाळ, भूतान देशासह भारतातील २३ राज्यांत जवळपास ६० हजार किलोमीटर पेक्षाही अधिक पदयात्रा करणाऱ्या श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक ०२ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून, दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौक येथे श्री महाश्रमणजी यांचे आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अभिवादन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैनबांधव सहभागी झाले. या वेळी श्री जैन श्वेताम्बर तेरापंथ सभाचे अध्यक्ष महावीर कटारिया, आचार्य महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीचे संयोजक महेंद्र मरलेचा, स्वागताध्यक्ष रतनमल दुगड आदींनी मनोगत व्यक्त केले.
यापूर्वी सन १९६८ मध्ये तेरापंथ धर्मसंघाचे नववे गुरु आचार्य श्री तुलसी हे पुण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ५७ वर्षांनी अकरावे आचार्य महाश्रमणजी यांचे पुण्यात आगमन झाले आहे. वाकडेवाडी- शनिवारवाडा- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मार्गे येताना विविध ठिकाणी आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर यांनी स्वागत केले.
मनुष्यत्व हे दुर्लभ सांगितले आहे. जे दुर्लभ आहे, ते आपल्याला मिळाले आहे. त्यामुळेच मनुष्य जीवनाला विशेष महत्व आहे. आपल्या जीवनात वेळेचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. मानवी जीवनात मिळालेल्या वेळेत आत्मकल्याणासाठी आपण खूपकाही करू शकतो. साधना किंवा आराधनादेखील या वेळेत होऊ शकते.
धर्म हा कल्पवृक्ष आणि चिंतामणी रत्न आहे. हे ज्याला मिळते तो अतिशय भाग्यशाली असतो आणि जी व्यक्ती मनुष्य जन्मात धर्म आराधना करत नाही, साधना करत नाही, ती व्यक्ती भाग्यशाली असू शकत नाही. त्यामुळे धर्माप्रती जागरूकता असणे गरजेचे आहे. त्यासाठीच वेळेचे मूल्यांकन आणि सदुपयोग आपण करायला हवा, असे श्री महाश्रमणजी यांनी प्रवचनात सांगितले.
नशामुक्त पुणे आणि नशामुक्त भारत या अभियानांतर्गत या दौऱ्यामध्ये आचार्य श्री महाश्रमणजी मार्गदर्शन करणार आहेत. आचार्य श्री महाश्रमणजी यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणासाठी पदयात्रा करत सद्भभावना, नैतिकता, व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत.
०२ एप्रिलपर्यंत वर्धमान सांस्कृतिक भवन आणि ०२ एप्रिलला तेरापंथ भवन, ०३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणीनगर आणि ०४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिती एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती यामध्ये सहभागी झाले होते.