अमोल मतकर
संगमनेर – शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या 50 किलोंच्या कट्ट्यामागे काही प्रमाणात धान्य कमी दिले जात आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू असून यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह हमालांचाही वाटा असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
शहराजवळ घुलेवाडी परिसरातील शासकीय गोदामातून तालुक्यातील 164 स्वस्त धान्य दुकानदारांना धान्यवाटप करण्यात येते. या धान्याचे प्रमाण गोणीमागे 50 किलोचे आहे. परंतु 50 किलोच्या गोणीमध्ये कधीच 50 किलो धान्य नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. हे कमी झालेले धान्य नेमके कुठे जाते, हा मात्र संशोधनाचा विषय आहे. गोदामपाल (लिपिक) हे मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून जागेवर नसून त्यामुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांचा पदभार सोडून गोदामपाल म्हणून पुरवठा निरीक्षक कार्यरत आहेत.
गोदामातील गोदामपाल या पदावरील लिपिक नेमके गेले कुठे? पुरवठा निरीक्षकांना गोदामपालच्या कार्यभार का स्वीकारावा लागला. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलच्या पुरवठा विभागावर नियंत्रण ठेवले जाते.
तालुकास्तरावरुन आलेल्या तक्रारीची चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार धान्य वाटपात त्रुटी, अनियमितता किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना निलंबित करणे अथवा अनामत रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे. संगमनेरमध्ये सुरू असलेला प्रकार आणि निरीक्षकाची भूमिका संशयास्पद असून, वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
तालुका धान्य वितरणात दोन महिने मागे
<धान्य पुरवठा नियमित स्वरूपात नसल्याने वितरणाचे स्टॅंडर्ड प्रमाण कधीकधी वेळेअभावी राखता येत नाही. वरिष्ठ पातळीवरून धान्य पुरवठा सध्या नियमित स्वरूपात नसल्याकारणाने शिधापत्रिका लाभधारकांना जून महिन्याचे धान्य दुकांनदारांमार्फत वितरित करण्यात येते आहे. याचा अर्थ संगमनेर तालुका तब्बल दोन महिन्यांनी वितरणात मागे असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.