नगर -“एक ना धड भराभर चिंध्या’ या म्हणीप्रमाणे महापालिकेचा अजब कारभार चालू असल्याने नगरकर अक्षरशः वैतागले आहेत. एकीकडे नगर शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दुसरीकडे पर्याय रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, तेही रस्ते आता महापालिकेने खोदून ठेवल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
या वाहतूक कोंडीमुळे अपघातांची मालिकाच सुरू झाली असून, गुरुवारी एकाचा बळी गेला आहे. क्रॉंक्रिटीकरण रस्ते करण्यासाठी माळीवाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व टिळक रस्ता निम्मा खोदल्याने या दोन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून, तासन्तास ताटकळत वाहने उभे राहत आहेत. विशेष म्हणजे भर पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून, खोदकामामुळे निम्मा रस्ता चिखलमय झाला असून, तेथे अपघात नित्याचे झाले आहेत.
शहरातील सक्कर चौक ते स्टेट बॅंक चौक असा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. ऑक्टोबरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने पुलाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, वळणावरील पुलाचे काम करण्यासाठी दीड महिना पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
सक्कर चौक ते माळीवाडा बसस्थानकापर्यंत उड्डाणपुलाखालचा रस्ता बंद करून सक्कर चौक ते आयुर्वेद महाविद्यालय असा रस्ता वाहतुकीसाठी पर्याय ठेवला आहे. तसेच आयुर्वेद महाविद्यालय ते स्वस्तिक चौक हा रस्तादेखील वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून या पर्यायी रस्त्यांवर अवजड वाहतुकीसह अन्य वाहनांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. नगर-पुणे असा मोठा रस्ता बंद असल्याने पर्यायीय लहान रस्त्यांवरून ही वर्दळ होत आहे. एक तर हे अरूंद रस्ते असतानाही कोणतीही ओरड न करता नगरकरांसह अन्य प्रवासी वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आहेत.
असे असताना महापालिकेने टिळक रस्ता निम्मा खोदून ठेवला आहे. भर पावसात या रस्त्याचे खोदकाम केल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्ता चिखलमय रस्ता झाला. त्यात मोठी व अवजड वाहनेदेखील या रस्त्याने ये-जा करीत असल्याने लहान वाहनांची अडचण झाली. रस्ता खोदल्याने एक मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली. परिणामी अपघात मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यातून गुरुवारी एकजण कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेने जागीच ठार झाला. आता याला जबाबदार कोण, असा प्रश्न आहे.
तीच अवस्था माळीवाडा वेस ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळादरम्यानच्या रस्त्याची आहे. हा रस्ता निम्मा खोदल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अनेक दिव्य पार करावे लागत आहे. त्यात या खोदकामामुळे निम्म्या रस्त्यावर माती पडली असून, पावसामुळे हा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले असून, अनेक जखमी झाले आहेत. या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा एवढा आग्रह का, असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.
मनपाकडून जाणूनबुजून ही रस्त्याची कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध केले. पण तेही खोदण्यात आले. यामुळे महापालिका नगरकरांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.
निधी जाण्याच्या भीतीने रस्ता कामे
माळीवाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यानचा रस्त्याच्या कामासाठी समाजकल्याणच्या दलित वस्तीमधून दोन कोटी निधी उपलब्ध झाला आहे. टिळक रस्त्यासाठी पर्यटन विभागाकडून पाच कोटी निधी मिळाला आहे. राज्य सरकार बदलल्याने अनेक कामांना स्थगिती मिळाली, तर काही कामे रद्ददेखील झाली. याही रस्त्याचा निधी हे सरकार परत घेऊ शकतो. या भीतीने आ.संग्राम जगताप यांनी तातडीने रस्त्यांचे काम सुरू करण्याचा आग्रह धरला.
शासनाच्या पर्यटन व समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या निधीतून हे क्रॉंकीट रस्ते करण्यात येत असून, दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करावे व निधी परत जाऊ नये, या उद्देशाने आमदार संग्राम जगताप यांनी या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला. अर्थात क्रॉंकिटीकरणाचे रस्ते असल्याने पावसाळ्यातही रस्ते करता येतात. त्यामुळे या रस्त्यांची कामे सुरू केली असून, उड्डाणपुलाखालील रस्ता 10 ऑगस्टपासून खुला करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले होते. त्यामुळे हे पर्यायी रस्तेकाम महापालिकेने सुरू केले. मात्र, पुलाखालचा रस्ता अद्यापही खुला न झाल्याने साहजिक या पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. पुलाखालचा रस्ता लवकरात-लवकर खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुरेश इथापे,शहर अभियंता, महापालिका