सातारा – करोनाच्या प्रादुर्भावामुळे जगाबरोबर देशाला आणि राज्याला झळ सोसावी लागली आहे. यामुळे अर्थचक्र थांबले, याचा फटका शेतकऱ्यांपासून ते उद्योगपतींनाही बसला. पहिल्या लॉकडाऊनपासून शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यावर शासनाने भर दिला असून शासन खंबीरपणे पाठीशी आहे, असे आश्वासन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी शनिवारी दिले.
पाटण तालुक्यातील गिरेवाडी येथील शिवारात गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बी- बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
तहसीलदार प्रमोद यादव, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, गिरेवाडीच्या सरपंच सुजाता शिंदे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांपासून उद्योगांनाही करोना झळ सोसावी लागली आहे.
यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी लागेल. या संकटाच्या काळात शेतकरी वाचला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. शासनाने पहिल्या लॉकडाऊनपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉकडाऊन जाहीर केला नसता तर आपल्याला फार मोठा फटका बसला असता, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. करोनाच्या संकटात पाटण तालुक्यातील 21 हजार 500 कुटुंबांना धान्यांचे कीट वाटप करण्यात आले आहे.
सुरक्षित अंतर ठेवणे हाच करोनापासून बचाव करण्याचा उपाय आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असून शेतकऱ्यांसाठी जे करावे लागेल ते शासन करीत आहे, असेही श्री. देसाई यांनी सांगितले. यावेळी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व हुमणी किड नियंत्रण प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.