पुसेगाव – खरीप हंगामामध्ये सोयाबीन महत्त्वाचे पीक असून कृषी उत्पादनवाढीमध्ये उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी जाखणगाव (ता. खटाव) येथे खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये केले. खरीप हंगामामध्ये सोयाबीन पीक प्रात्यक्षिके व शेती शाळेचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शननानुसार सुरु आहे. त्यावेळी म्हेत्रे बोलत होते.
सुधारीत बियांणाचा वापर, पेरणीपुर्वी रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया, रासायनिक खतांचा माती परीक्षणानुसार वापर, संरक्षित पाण्याच्या पाळया व पीक संरक्षण या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी योग्य प्रकारे केल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ हाईल, असे त्यांनी सांगितले. सोयाबीनमध्ये बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास बियांणाची बचत होवून हवा खेळती राहील्याने उत्पादनात वाढ होते, असे महेश झेंडे यांनी सांगितले. कृषी विभागच्या बांधावरील फळबाग लागवड, गांडूळ व नाडेप, खतनिर्मिती युनिट योजनांबद्दल यावेळी अरुण जाधव यांनी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक किरण काळे, बाळासाहेब भोईटे व जाखणगाव येथील योगेश गाढवे, संतोष महाडिक, जितेंद्र शिंदे व सुखदेव शिंदे यांनी परिश्रम घेतले.