नवी दिल्ली – देशातील अनेक लसीकरण केंद्रांवर लस शिल्लक नसल्याचे बोर्ड लावलेले असतानाही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देशात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे जे विधान सातत्याने केले आहे, त्यावर कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सडकून टीका केली आहे. हर्ष वर्धन यांचे हे विधान पोकळ निघाल्याचे त्यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. येत्या 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे पण या निर्णयामुळे जबाबदारीही वाढणार आहे हे केंद्र सरकारने लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, सध्या देशात लसीचा तुटवडा असल्याची ओरड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लसीची सुरळीत उपलब्धता याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. देशात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे हा सरकारचा दावा साफ खोटा व पोकळ निघाला आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. येत्या 1 मे पासून लोकांची लसीकरणासाठीची गर्दी वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असेल काय, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
लसीअभावी लोकांना लसीकरण केंद्रातून परत जावे लागले तर लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होईल. 18 वर्षांवरील सर्वांना 1 तारखेपासून लस देण्याचे सरकारने खूप आधीपासून ठरवले आहे. पण त्या प्रमाणात त्यांनी नियोजन केले आहे की नाही याचा अजून काही अंदाज येत नाही. पण निदान आतापासून तरी याची तयारी सुरू करा आणि लसीच्या वाढत्या मागणीची गरज भागवा अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली आहे.