मुंबई – बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात ठोस कारवाई करता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असून यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील कायदा करण्यात येणार आहे. याबाबत विधानसभेमध्ये माहिती देताना राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, “बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करणारा कायदा आंध्रप्रदेशात आहे. या कायद्याचा अभ्यास सुरु असून तो महाराष्ट्रात देखील लागू करण्यात येईल.”
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे पुरवठा करण्यात आलेल्या भेसळयुक्त बियाणांप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर विरोधकांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना दादाजी भुसे यांनी, “महाराष्ट्र सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाबिजला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे भेसळयुक्त सोयाबीन-७१ जातीच्या बियाणांचा पुरवठा करण्यात आल्याचे प्रकरण जानेवारीमध्ये उघडकीस आले होते. याप्रकरणी विद्यापीठाकडून दंड वसूल करण्यात येईल.” अशी माहिती दिली.