अकोला – लोकसभेत घुसखोरी करून चार तरुणांनी घातलेल्या गोंधळानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, संसदेत घुसणाऱ्या तरूणांनी सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केले आहे. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर सरकारने या तरूणांची शिक्षा माफ करावी अशी मोठी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यात बोलत होते.
लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणारऱ्या चार आरोपींमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचा देखील सहभाग आहे. चाकूर तालुक्यातील झरी (खू.) गावात राहणारा अमोल शिंदेला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकार नोकऱ्या देऊ शकले नाही. त्यामूळे त्या मुलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कायदा मोडला. हे बरोबर आहे, मात्र त्याची शिक्षा द्यायची की माफ करायाची, हे सरकारने ठरवले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.
संसदेची सुरक्षा कमकुवत होती. संसदेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता असताना ती दिल्ली पोलिसांकडे का दिलीय? जुनी सुरक्षा व्यवस्था मजबूत होती.
उद्या आणखी काही घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. कोणत्या घटनेला किती महत्व द्यायचे हे सरकारने ठरवावे. त्यामुळे सरकारने या तरुणांना माफ करावे आणि हा इश्यू क्लोज करावा, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
लोकांचा आशीर्वाद महत्वाचे !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावर प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडूंचे आभार मानले, बच्चू कडू यांनी जरी ही इच्छा व्यक्त केली असली तरी शेवटी लोकशाहीत यासाठी लोकांचा आशीर्वाद आणि संख्याबळ महत्वाचे असते, असे मत आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त केले.