महाबळेश्वर – मुंबईतून तालुक्यात आलेले चाकरमानी प्रशासनाने दिलेला होम क्वारंटाइनचा आदेश धाब्यावर बसवून गावभर फिरत असल्याने गोगवे, सौंदरी येथे तीनशे जणांच्या हातांवर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाइन सक्तीचे करण्यात आले आहे.
हीच प्रक्रिया तालुक्यातील अन्य गावांमध्ये राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार सुषमा पाटील-चौधरी यांनी दिला आहे. दरम्यान, कोकणातून जिल्ह्यात येणाऱ्या लोंढ्यांवर प्रशासनानचे नियंत्रण मिळविले असले तरी पुणे, मुंबईतील लोक अजूनही गावाकडे येत आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन घोषित केला. मुंबईत सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळल्याने तेथे रोजगारासाठी गेलेल्या हजारो चाकरमान्यांनी गावाकडे धाव घेतली. चार दिवसांतच गावागावांत परतलेल्या चाकरमान्यांची संख्या दुप्पट झाली. थोड्या फार
फरकाने हीच स्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. याच लोकांकडून करोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याने प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
पुणे, मुंबईतून आलेल्या लोकांची तपासणी व नोंदी सुरू करण्यात आल्या आहेत. घराबाहेर न पडण्याचा आदेश झुगारून देत गावभर फिरणे, क्रिकेट खेळणे, तलाव अथवा नदीत पोहणे. शेतात पार्ट्या करणे, असे उद्योग या मंडळींनी सुरू केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने प्रशासनाने अशा लोकांच्या हातांवर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाइनची सक्ती केली आहे. तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या उपस्थितीत गोगवे व सौंदरी या गावांमध्ये तीनशे लोकांच्या हातांवर शिक्के मारण्यात आले. ही मोहीम तापोळा भागातील गावांमध्ये राबविण्यात येणार आहेत. ही सक्ती मोडून कोणी गावात फिरत असल्याचे दिसल्यास या बेजबाबदार लोकांना शासकीय रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.