नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमधील लाजिरवाणा पराभव आणि त्यानंतर बरेच दिवस रंगलेले राहुल गांधींचे राजीनामा नाट्य या घडामोडींनंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे आली. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ ५२ खासदारांचे संख्याबळ आणि देशभरातील २ राज्यांमध्ये सत्ता अशी दयनीय अवस्था झालेल्या देशातील सर्वाधिक जुन्या पक्षाची कमान पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या हातात आल्यानंतर मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे.
सोनिया गांधी यांनी पक्षाची कमान नव्याने हाती घेतल्यापासूनच त्यांनी लोकसभा निवडणुकांमधील ‘एकला चलो रे’ धोरणाला बाजूला ठेवत केवळ समवैचारिकच नव्हे तर वेळ पडल्यास भिन्न विचारसरणीच्या पक्षांशी देखील हातमिळवणी केली. सोनिया गांधी यांच्या याच धोरणाचे यश म्हणजे केवळ २ राज्यांमध्ये सत्तेत असलेले काँग्रेस लोकसभा निवडणुकांमधील मानहानीकारक पराभवानंतर देखील आज ७ राज्यांमध्ये सत्तेत आहे.
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला अनपेक्षित यश मिळालं. हरयाणातील सत्ता काँग्रेसच्या हातातून थोडक्यात निसटली. महाराष्ट्रात मात्र एका नव्या आघाडीसोबत जात काँग्रेसने हे चित्र पलटवलं. राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रात सोनिया गांधी यांनी भिन्न विचासरणी असलेल्या शिवसेनेसोबत जाण्याचे धैर्य दाखवत सर्वानाच धक्का दिला. तर वर्षातील शेवटच्या टप्प्यात पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला केवळ सोबतच न घेता त्यांच्या पदरी जादा जागा टाकण्याचं आणि हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याचं औदार्य त्यांनी दाखवलं. याचाच परिणाम म्हणून आज झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएम सरकार बहुमतामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय.
एकंदरीतच सोनिया गांधी यांच्या आतापर्यंतच्या निर्णयांमधून त्यांनी सद्य राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज बांधून लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे खचून गेलेल्या काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केल्याचं दिसतंय.