पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- भारताच्या अर्थव्यवस्थेचे पैलू लक्षात घेऊन संशोधनाच्या माध्यमातून गोखले इन्स्टिट्यूट ही जागतिक समूहाला दिशा दाखवू शकेल, असा विश्वास संस्थेचे कुलपती आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी व्यक्त केला.
गोखले इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डाॅ. अजित रानडे उपस्थित होते. यावेळी राजीव कुमार यांनी देशाने करोनानंतरच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात संपादित केलेल्या यशाचे दाखले दिले. या वाढीचे व अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याचे श्रेय त्यांनी परिणामकारक आर्थिक नियोजन व धोरणांना दिले. भारतासाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेची आजची स्थिती, लोकसंख्येचा फायदा तसेच वित्तीय एकत्रीकरण याचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
भारताच्या विकासाच्या धोरणात आमूलाग्र बदलाची गरज आहे. देशापुढे असलेल्या जागतिक हवामान बदल, रोजगार आणि स्थानिक मतभेद यांसारख्या आव्हाने आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आपल्याला जिल्हा पातळीवर विकास, रसायनविरहित शेती तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीसारखी पाऊले उचलावी लागतील, असेही कुमार यांनी सांगितले. प्रश्नोत्तरांदरम्यान त्यांनी मेक इन इंडिया किंवा स्किल इंडिया सारख्या योजनांच्या परिणामांचेही अवलोकन केले.