Manoj Jarange patil – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. काल बुधवारपासून जरांगे यांनी पाण्याचा त्यागही केला आहे. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोवर ते उपोषण सुरूच ठेवणार आहे.
अशात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाणार आहे. अशात आता यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या शिष्टमंडळाने जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे. सरकारने जरांगेंशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आदिवासी, ओबीसी किंवा इतर समाज अशा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे करणं केंद्र सरकारच्याच हातात आहे.”
संजय राऊत पुढे म्हणाले,’ यासर्वात मनोज जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहे. त्यांच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही.. सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे का? राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घेत नाहीये, पंतप्रधान मोदींनी किमान दुरध्वनीवरून मनोज जरांगेंशी बोलले तरी पाहिजे. तेही बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का?”असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.