सातारा – ज्यामध्ये जय किंवा पराजय अपेक्षित असते, त्यालाच निवडणुका म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे. तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हुरळूनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं तोंड वर करुन विचारताय तर आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या. ती जी कारणे असतील तीच आमची समजा, असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
बॅंक कायदेशीर मर्ज केली असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बॅंक स्थापन केली होती का, एक बॅंक तुमच्या अंदाधुंद भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली. त्याकरीता दुसऱ्या बॅंकेचाही गळा घोटला. सहकारी बझारचे रेस्टॉरंट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले. हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही. परंतु, हाच तुमचा खरा वारसा आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात केली आहे.
उदयनराजे म्हणाले, “”आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही. तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंवा कार्यकर्त्यांचे विक पॉईट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यामुळे आहे अशी भावना तुमची. सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा तर सहकार म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता ही तुमची धारणा. हा मुलभुत फरक आहे.
त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा वेगळी आहे.” अजिंक्यतारा कारखाना निवडणुक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेऊन तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालू नका. मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो असेही म्हणाला होता. हे इतक्या लवकर कसे विसरलात, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
सातारा- कराड हे जंक्शन नाही. त्यामुळे येथून गाडी सुरु करता येत नाही, याचेही यांना भान नाही. प्लॅटफॉर्म लांबी, प्लॅटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दुहरीकरण, विद्युतीकरण प्रवाशांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी कामे केली आहेत. 10- 12 वर्षापूर्वी फक्त 9 गाडयांची ये- जा सुरु होती. आज रोजी 19 गाडयांची ये- जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप ऍन्ड डाऊन 18 गाडयांच्या तुलनेत 38 रेल्वेगाडया आज सातारा कराडमधून धावतायत, एकदा डोळयात अंजन घालून बघा म्हणजे दिसेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.