केपटाऊन – भारताचा मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणे सातत्याने अपयशी ठरत असला तरीही त्याला आणखी संधी दिली जाणार आहे, असा खुलासा भारतीय संघ व्यवस्थापनाने केला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रहाणे सातत्याने अपयशी ठरत आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने एका सामन्यात 48, तर अन्य लढतींत 58 धावांची खेळी केली होती. मात्र, संघाला गरज असतानाच तो अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर प्रचंड टीका सुरू झाली.
तसेच त्याला वारंवार संधी देणारी निवड समिती व संघ व्यवस्थापनही टीकेचे धनी बनले होते. मात्र, रहाणे नेटमध्ये कसून सराव करत आहे. त्याची फलंदाजीदेखील सरावात योग्य होत आहे, केवळ त्याला प्रत्यक्ष सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे.
मात्र, त्याच्यावर संघ व्यवस्थापन, निवड समिती, मुख्य प्रशिक्षक व कर्णधार या सर्वांनाच विश्वास असल्याने त्याला पाठिंबा देतच राहणार असून, पुढील काळातही त्याला सातत्याने संधी दिली जाईल, असेही संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.