नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेला नव्हे तर देशाकडून खेळण्याला प्राधान्य द्यायला हवे. आपण जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतो हे प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवून पूर्ण जबाबदारीने खेळले पाहिजे, अशा शब्दात भारताचे माजी कर्णधार व महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी विराट कोहलीच्या संघावर ताशेरे ओढले आहेत.
बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेत जे झाले ते लवकरात लवकर विसरले पाहिजे. आता पुढील विश्वकरंडक स्पर्धेसाठी नियोजन केले पाहिजे. पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. आयसीसीच्या गेल्या आठ स्पर्धांमध्ये असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी मालिकांकडे नियोजनात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. विश्वकरंडक स्पर्धा भारतीय संघासाठी अपयशी ठरली आहे म्हणजे भारतीय संघाचे क्रिकेट संपले असा अर्थ होत नाही. सराव सत्रात मेहनत घ्या, कमकुवत दुवे दूर करा. तसेच बीसीसीआयने देखील आयपीएल आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा यात अंतर ठेवले पाहिजे, असेही कपिल देव म्हणाले.
काही क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत खेळणे जास्त पसंत करतात, पण देशाचे प्रतिनिधित्व करण्याला महत्त्व देत नाहीत.
बीसीसीआयने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. क्रिकेटपटूंनी आयपीएल क्रिकेट खेळण्याच्या विरोधात नाही, पण जेव्हा खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात असे चित्र दिसू नये. खेळाडूंना देशासाठी खेळण्याचा अभिमान वाटला पाहिजे. आधी देशाचा संघ आणि नंतर आयपीएल स्पर्धेचा विचार करावा. या स्पर्धेतील आमच्यासाठी सर्वात मोठा धडा म्हणजे आधी केलेल्या चुका पुन्हा न करणे हाच असेल, असेही कपिल देव यांनी म्हटले आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे भारतीय संघाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला पराभूत केल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा टी-20 विश्वकरंडक आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, संघाच्या पराभवामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला.
स्पर्धांमध्ये अंतर हवे – भरत अरुण
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या अपयशावर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी वेळापत्रकावर टीका केली. या स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आले म्हणून त्यांच्यावर सातत्याने टीका करणे योग्य नाही. दरवर्षी किंवा ठरावीक वर्षांनी होत असलेल्या आयसीसीच्या स्पर्धा व आयपीएल स्पर्धा यात काही दिवसांचे अंतर राखले पाहिजे, असे मत अरुण यांनी व्यक्त केले.