सातारा – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विलासपूर, गोडोलीतील गोळीबार मैदान, इंदिरानगर वसाहतीला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक फिरोज पठाण आणि नागरिकांनी प्राधिकरणाच्या अधिकार्यांना सोमवारी घेराव घातला. पुरेशा दाबाने, पुरेसे पाणी द्या, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा नागरिकांनी दिला.
यावेळी अधिकारी आणि नागरिक यांच्यात जोरदार वाद झाला. सातारा शहराच्या पूर्वेला हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या विलासपूर, गोळीबार मैदान आणि इंदिरानगर वसाहतीला गेल्या दोन महिन्यांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. इंदिरानगर वसाहतीत पाच लाख लिटरची पाण्याची टाकी असूनही, नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी फिरोज पठाण यांना यात तातडीने लक्ष घालण्याची सूचना दिली. त्यानंतर पठाण यांनी नागरिकांसमवेत सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अभियंत्या सौ. गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जोरदार वाद झाला. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मंजूर करून आणलेल्या 36 कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. हद्दवाढ क्षेत्रात टँकरचा प्रस्ताव तुम्ही जिल्हाधिकार्यांना दिला का, असा सवाल पठाण यांनी केला. शिंदे नावाचे अभियंता मनमानी करून, कोणालाही नळ कनेक्शन देत आहेत. मात्र, गरजू नागरिकांनी दोन दोन वर्षे मागणी करूनही, त्यांना नळ कनेक्शन मिळत नाही. प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पुरेसे पाणी द्या, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू आणि पोवई नाका येथे रास्ता रोको आंदोलन करू. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असा इशारा पठाण यांनी दिला.