मुंबई – राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून केली आहे.
राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस (Heavy rain) व गारपिटीने शेतीचे व शेतकऱ्यांचे अपार नुकसान झाले आहे. आधीच खरीप हंगाम वाया गेला आहे आता रब्बी हंगामही हातातून गेला आहे. यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. सप्टेंबरपासूनच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे, धरणातील पाणीसाठाही पुरेसा नाही, त्यात आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिके वाया गेली आहेत. कापूस, तूर, सोयाबीन, कांदा, धान, द्राक्षे, आंबा, डाळींब, पपई, केळी, ऊस, संत्रा या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
सरकारने खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना कोट्यवधी रुपये दिले पण या कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई काही दिली नाही. एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. (Farmer)
शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी तसेच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसरकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी आपणास विनंती आहे, असे पटोलेंनी पत्रात म्हटले आहे.