पवनानगर (वार्ताहार) – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ऐतिहासिक वारसा असलेला खंडाळा-बोर घाटातील अमृतांजन पूल लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदीच्या काळात पाडला. त्यामुळे सर्व स्तरातून प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. प्रशासनाने पुलाचे घडीव दगडांचा लिलाव न करता ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देऊन दुर्गसंवर्धनासाठी त्याचा उपयोग करावा, अशी मागणी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आली आहे.
पूल बांधण्यात आला तेव्हा बांधण्याकरिता वापरण्यात आलेल्या घडीव दगड पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर पडझड झालेल्या वास्तूंचे डागडुजीचे (गडसंवर्धन) कार्य गेल्या काही वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने सुरू आहे. या कामासाठी नुकत्याच पाडलेल्या ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलाच्या दगडे उपयोगात आणून या ऐतिहासिक वास्तूचे ऐतिहासिकपणा टिकून राहील. या उद्देशाने संस्थेच्या पदाधिकारी व गडप्रेमींनी ही मागणी आमदार शेळके यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गडसंवर्धनाच्या कामात तिकोना गडावरील ढासळलेल्या व नामशेष होऊ लागलेल्या पायऱ्यांचे, तटबंदीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात घडीव दगडांची आवश्यकता भासत आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्चही होत आहे. आत्तापर्यंत दुर्गसेवकांनी स्वतः वर्गणी करून, दानशूर व्यक्तींच्या व गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून तिकोणावर विविध विकासकामे केली आहेत. शिवाय निधी अभावी अनेक कामे रेंगाळलेली आहेत. परंतु जसे पैसे उपलब्ध होतील त्यानुसार कामे पूर्णत्वास नेऊन गडाला गडपण आणण्यासाठी गडप्रेमींकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
शासनाने नुकताच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या खंडाळा घाटातील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन (189 वर्ष) जुना अमृतांजन पूल की जो पूर्ण घडीव दगडात बांधण्यात आला होता. तो स्फोटकांच्या साहाय्याने पडला. त्या पाडलेल्या पुलाच्या राडारोड्यात मोठ्या प्रमाणात घडीव दगड असून त्याचा वापर किल्ले तिकोणागडावरील वास्तूंच्या डागडुजीकरिता होऊ शकतो. किल्ले तिकोनागडावरील डागडुजीकरिता अशा दगडांची आवश्यकता असल्याने सदर दगडींचा लिलाव अथवा टाकून न देता ते गडावरील वास्तूची डागडुजी (संवर्धना) करिता मिळण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ महाव्यवस्थापक मुंबई व मावळ विधानसभा आमदार शेळके यांना ई-मेल पाठवून विनंती करण्यात आली आहे. हे दगड गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी दिल्यास खर्च कमी होईल.