जम्मू काश्मीर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी स्वत: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्यांचा अधिक फोकस विधानसभा निवडणुकीवर राहणार असल्याचे समोर आले आहे.
कॉंग्रेसमधील प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतर आझाद यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये त्या पक्षाचा हात सोडला. त्यांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाची (डीपीएपी) स्थापना केली. आता तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून तो पक्ष पहिल्यांदाच राजकीय परीक्षेला सामोरा जाणार आहे. मात्र, त्या निवडणुकीत स्वत: उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नसल्याचे आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मला डीपीएपीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागेल. मी स्वत: निवडणूक लढलो तर एकाच ठिकाणी अडकून पडेल, असे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणूक वेळेत होईल. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीसाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे ती निवडणूकही घ्यावी लागेल. साहजिकच, जम्मू-काश्मीरच्या दृष्टीने २०२४ हे निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे.
त्यामुळे डीपीएपीच्या नेते-कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन आझाद यांनी केले. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्येच सक्रिय राहण्याचे संकेत याआधीच दिले होते. आता त्यांचा भर प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीवर राहणार असल्याचे सूचित होत आहे.