औरंगाबाद – मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर तोडगा म्हणून फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी वॉटर ग्रिड योजना बंद करण्याचा घाट सध्याच्या आघाडी सरकारने घातला असून ठाकरे सरकार मराठवाड्याच्या मुळावर उठले आहे, असा गंभीर आरोप माजी पाणीपुरवठा मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. या संबंधी त्यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिले आहे.
माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, मराठवाड्यातील उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय वॉटर ग्रिड योजनेतून केली जाणार होती. परंतु आता ही योजना बंद केल्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ पूर्णपणे संपविण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.
विद्यमान महाविकास आघाडी सरकारने ही योजना बंद करुन मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
मराठवाड्याला पाणी देणारी ही अभिनव योजना ठाकरे सरकारनं जुजबी कारण दाखवत गुंडाळली असून कामाच्या निविदा थंड बस्त्यात गुंडाळून ठेवल्या आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी सरकारने जनतेच्या तोंडाशी आलेले पाणी थांबवण्याचे काम सरकार करीत असल्याचे लोणीकर यांनी राज्यपाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.