समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी समर्थकांसह काल (दि.14) तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हैदराबाद येथे पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत माजी आमदार राहुल जगताप यांना मिळणाऱ्या अधिकच्या “वेटेज’मुळे अस्वस्थ असलेल्या शेलार यांनी राष्ट्रवादीला पुन्हा रामराम ठोकला.
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल जगताप आणि अनुराधा नागवडेंनी रिंगणातून माघार घेतल्यानंतर शेलार यांनी राष्ट्रवादीकडून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवत 98 हजार मते घेतली होती. ते साडेचार हजार मतांच्या फरकाने आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून पराभूत झाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल असे गृहित धरुन त्यांनी मतदारसंघात संपर्क कायम ठेवला आहे. मात्र त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक माजी आमदार राहुल जगताप यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली. त्यावेळीच विधानसभेची उमेदवारीही जगतापांनाच देण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी दिले होते.
जगताप यांचे पक्षात वाढणारे वजन शेलारांसाठी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेलार पक्षात अस्वस्थ होते. राहुल जगताप यांचे पक्षातील वाढते “वेटेज’ पाहता शेलार यांना पक्षांतर करायला भाग पाडल्याचेही बोलले जाते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची स्वतंत्र भेट घेत दोघांकडे भूमिका मांडली होती.
मात्र या बैठकांमध्ये नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेलार प्रचंड अस्वस्थ होते. दरम्यानच्या काळात “बीआरएस’कडून पक्षप्रवेशाची “ऑफर’ आल्याने शेलार आणि “बीआरएस’मध्ये प्रवेशाबाबत बोलणी सुरू होती. अंतिम चर्चेसाठी शेलार यांनी आज “केसीआर’ यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शेलार यांनी बीआरएस’मध्ये प्रवेश केला. शेलार यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती विलास भैलूमे, राष्ट्रवादीचे संजय आनंदकर, सरपंच शरद पवार, श्याम जरे आदींचा पक्षात प्रवेश झाला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे शेतकरी व सामान्यांच्या हिताचे “तेलंगणा मॉडेल’ नक्कीच आदर्श आहे. या मॉडेलच्या माध्यमातून राज्याचाच नव्हे तर देशाचा विकास साधता येईल. त्यांच्या विकासाच्या “मॉडेल’ला साथ देण्यासाठी पक्षात प्रवेश केला आहे, असे घनश्याम शेलार म्हणाले.