अहमदाबाद – कच्छचे रण म्हणून आपण जो भाग ओळखतो, तो म्हणजे गुजरातच्या वाळवंटाचा अगदी गाभा क्षेत्रातला परिसर. पाण्याचे दुर्भिक्ष्य किंवा दुष्काळ इथे पाचवीलाच पुजलेला. मग दरवर्षी थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की या परिसरातल्या 100 हून अधिक गावातील नागरिक स्थलांतरास सुरुवात करतात. पाणी मुबलक असेल, अशा ठिकाणी चार महिने रहायचे आणि पावसाळ्याच्या तोंडावर घरी परतायचे. अगदी आपल्या माण-खटाव या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात असते, तसेच चित्र येथेही पहायला मिळते.
मात्र, आताशा रापार तालुक्याचा रहिवासी असलेला रावजी तर्सी कोळी रोज सकाळी आपल्या घराजवळच्या शेततळ्यामध्ये जाऊन शिल्लक असलेल्या पाण्याची पातळी मोजताना दिसतो. आता त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला उन्हाळा असला तरी गाव सोडून जावे लागत नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अहमदाबाद येथील गझाला पॉल नामक महिलेने तिच्या “समर्थ’ नामक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कच्छमधील 97 खेड्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे आणि तेथील नागरिकांचे होणारे तापुरते स्थलांतर कायमचे थांबवले आहे.
गझाला पॉल यांनी वर्ष 2009 पासून या जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली. त्याचे दृष्य रुप आता समोर येत आहे. रापार तालुक्यातच किमान पाच हजार जणांना रावजी कोळीप्रमाणे शेततळ्याचा लाभ झाला असून आता हे सर्व लोक गझाला पॉलला “जलदेवता’ म्हणू लागले आहेत. विहिरी, शेततळी आणि हर प्रकारच्या जल संधारणाच्या योजना आपल्या संस्थेमार्फत राबवून गझाला पॉल यांनी कच्छसारख्या वाळवंटी प्रदेशाचे रुपडे पालटून टाकले आहे.
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात “पाणी फौंडेशन’ने जसे लोकसहभागातून जलसंधारण साधले आहे, तसेच काम गझाला पॉल यांनी गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर विविध पारितोषिकांचाही वर्षाव झाला आहे.