बीज सोहळा : देहू संस्थान-पोलीस यांची संयुक्त पत्रकार परिषद
देहूगाव – श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत 50 भाविकांमध्ये संपन्न करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. 23) सकाळी देण्यात आली. तसेच 29 आणि 30 मार्च रोजी देहूत जमावबंदीचा आदेश जारी केला असल्याचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी स्पष्ट केले आहे.
संस्थानचे अध्यक्ष हभप मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यावेळी उपस्थित होते.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने 50 नागरिक, भाविकांमध्ये उपस्थित बीज सोहळा संपन्न करण्याची परवानगी दिली. देहूत बीज सोहळा दिनी भाविकांना येण्यास मज्जाव केला आहे. मात्र, बंडातात्या कराडकर यांनी करोनाच्या नावाखाली सरकार तीर्थक्षेत्रावरील यात्रा व सांप्रदायिक सप्ताह बंद करीत आहे.
“चलो देहू, चलो देहू’चा संदेश देत, सांप्रदायिकांना, संघटना, संस्था व गावोगावच्या भजनी मंडळांना बीजोत्सवास मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. दिंडी समूहाने प्रतिवर्ष प्रमाणे येण्याचे आणि सोमवारी (दि. 29) दुपारी 4 वाजेपर्यंत देहूच्या वेशीवर हजर राहण्याचे आवाहन करत सरकारच्या आदेशाचा भंग करीत प्रवेश करणार आहोत. पोलीस जिथे अडवतील तेथे अटक करून घ्यावे या प्रकारचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याने बीज उत्सव कशाप्रकारे संपन्न होणार, असा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे पोलीस आणि संस्थान यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाला सहकार्य केले. शासनाने घालून दिलेल्या निकषाचे व नियमांचे पालन करीत 50 नागरिकांच्या उपस्थित बीज सोहळा संपन्न करण्यात येईल, असे ठाम मत व्यक्त केले आहे. तर नागरिकांनी, भाविक, वारकऱ्यांनी देहूत न येता घरीच भजन, कीर्तन, हरिनामाने बीज सोहळा संपन्न करावा, असे आवाहनही केले आहे.
28 मार्चच्या मध्यरात्रीपासून नाकाबंदी
देहूत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर रविवारी (दि. 28) मध्यरात्रीपासून देहूच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात येणार असून, पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशान्वये 29 व 30 असे दोन दिवस देहू परिसरातील व्यवसाय बंद असणार आहेत. तर जमावबंदी लागू असल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.