मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी,मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. तर दुसरीकडे गौतमीवर टीकाही केली जाते तिचा कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणीही समाजातील काही लोकांकडून केली जात आहे. दरम्यान, या सगळ्यात आता गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना गौतमी म्हणाली की, “माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे.
याच कारणाने मला लग्न करायचं आहे. मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन’. असं यावेळी गौतमी पाटील म्हणाली.