नाशिक – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची तर औरंगाबाद, नागपूर, कोंकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजित तांबे (अपक्ष) यांच्या उमेदवारीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
गुरुवारी (दि. 12) दुपारी ऐनवेळी काॅंग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या डाॅ. सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. काॅंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांना, पक्षश्रेष्ठींना विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे काॅंग्रेसचा सत्यचित तांबे यांना पाठिंबा नसेल, अस काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. तांबे यांनी पक्षाची फसवणूक केली असल्याचेही पटोले यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या ठिकाणी धनराज विसपुते (अपक्ष), धनंजय जाधव (अपक्ष) यांच्याशी सत्यजित तांबे यांची लढत होणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले होते. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म दिला होता, पण त्यांनी अर्जच भरला नाही.
सत्यजित तांबे म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती, की विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची आणि काँग्रेसमधल्याच अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे मला शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज भरला, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले. तसेच मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरीही मी काॅंग्रेसचाच उमेदवार असल्याचे गुरुवारी त्यांनी म्हंटले होते मात्र, महाराष्ट्र काॅंग्रेसने आता सत्यजित तांबे यांना पाठिबा देण्यास नकार दर्शविला आहे.
या सगळ्या नाट्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले आहे की, मी दोन अर्ज भरले. एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष म्हणून. परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारांवर मी काम केलं आहे. अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर आपण भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटले. राजकीय विचारसरणी आणि राजकीय पक्षाच्या सीमांच्या पलिकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी राहावं ही माझी सर्वांना विनंती आहे. माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्य़कर्ता म्हणून आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी मला मदत करावी अशी विनंती मी त्यांना करेन, असे सत्यजित तांबे यांनी म्हंटले आहे.
डॉ. सुधीर तांबे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, एका तरुण नेतृत्वाला संधी द्यावी असे माझे या मतदारसंघातील मतदारांना आवाहन आहे. सत्यजित तांबे यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी शहरीकरणाच्या मुद्द्यावरही पुस्तक लिहिले आहे. त्यांना सामाजिक राजकीय प्रश्नांची, उद्योग वगैरे क्षेत्रांची जाण आहे, असेही डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटलं. दरम्यान, या सगळ्या गोंधळानंतर काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करूनही अर्ज न भरल्याने डॉ. सुधीर तांबेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी आजच काॅंग्रेस नेतृत्वाकडून कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच काॅंग्रेस आता दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.