Team India – भारतीय क्रिकेट संघासाठी यंदाचे वर्ष अत्यंत महत्वाचे असणार आहे. त्यामुळे भारताने मायदेशातच होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी देखील सुरु केली आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारताने श्रीलंकेला अगोदर टी-२० मालिकेत २-१ने मात दिली तर त्यानंतर आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये टीम इंडियाने २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाने यंदाच्या वर्षाची सुरुवात दमदार केलेली आहे. २०२३ या वर्षात एकदिवसीय विश्वचषकासह आशिया चषकही होणार आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्हीही मोठ्या स्पर्धा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला या वर्षात १२ निश्चित एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १ जानेवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत मिशन २०२३ वनडे वर्ल्डकपसाठी काही योजना आखल्या आहेत. बीसीसीआयकडून या एकदिवसीय विश्वचषकासाठी २० खेळाडूंच्या नावांचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वचषकाअगोदरच्या काळात या खेळाडूंवर लक्ष ठेवले जाईल आणि त्यानुसार शेवटाच्यावेळी संघ निवड केली जाईल. तसेच, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी निवडकर्त्यांसोबत या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्षपूर्वक काम करणार आहे. मात्र, बोर्डाने त्या २० खेळाडूंची नावे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांनी आपापल्या पद्धतीने अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.
निवडीसाठी २८ खेळाडूंना संधी
बीसीसीआयने २० खेळाडूंचा आकडा सांगितला आहे. मात्र, तसे पहिले तर संघात निवड होण्यासाठी सध्या तरी २८ खेळाडू यासाठी दावेदार आहेत. त्यापैकी बऱ्याच खेळाडूंना वेगवेगळ्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. त्यातूनच शेवटी एकदिवसीय विश्वचषकासाठी मुख्य भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या २८ खेळाडूंमध्ये पाच सलामीवीर आहेत, सहा मधल्या फळीतील फलंदाज आहेत, तर पाच फिनिशर किंवा अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचबरोबर या यादीत नऊ वेगवान गोलंदाज आणि स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय.
सलामीचे दावेदार खेळाडू
एकदिवसीय विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड ही प्रमुख नावे समोर येतात. रोहित, शुभमन, ईशान आणि धवन या भूमिकेसाठी फेव्हरेट असले तरी, श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी धवनला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत आगामी मालिकेसाठी निवड समिती धवनला परत बोलावते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सलामीला युवा खेळाडू म्हणून शुबमन आणि ईशान सध्या चांगली करत आहेत.
मधल्या फळीतील चित्र स्पष्ट
टीम इंडियाच्या मधल्या फळीत फलंदाजीसाठी विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांची संघात निवड होणे जवळपास निश्चित आहे. याशिवाय ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यावरही निवड समितीची नजर असणार आहे. मात्र, गेल्या महिन्यात पंतचा कार अपघात झाला. त्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही. अशा स्थितीत एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पंतचे संघातील पुनरागमन अशक्य मानले जात आहे.
अष्टपैलू खेळाडू ठरणार संकटमोचक
कोणत्याही संघासाठी त्यांच्याकडे असलेले फिनिशर्स आणि अष्टपैलू खेळाडू हे संघाचे प्राण असतात. अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश असणे म्हणजे त्या संघासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीकडून फायदा मिळतो. २०११ चा विश्वचषक भारताने जिंकला कारण टीम इंडियाकडे अष्टपैलू खेळाडूंमुळे गोलंदाजीचे अनेक पर्याय होते. अशा परिस्थितीत यंदाच्या विश्वचषकातही भारताला अष्टपैलू खेळाडूंची गरज भासणार आहे. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांची नावे संघात निश्चित असल्याचे मानले जात आहे.
त्याचबरोबर सप्टेंबरपासून टीम इंडियातून बाहेर असलेला रवींद्र जडेजा कधी पुनरागमन करतो आणि त्याचा फॉर्म कसा राहील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जडेजा हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. जडेजाच्या पुनरागमनामुळे संघाला मोठी मजबुती मिळू शकते. या तिघांशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा यांच्याकडेही अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडकर्त्यांचे लक्ष राहणार आहे.
वेगवान गोलंदाजांची दुखापत डोकेदुखी
भारतीय संघाला वेळोवेळी उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांची कमतरता भासत आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील काही काळापासून दुखापतीने ग्रस्त आहे. त्याचबरोबर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही अनेकवेळा संघातून बाहेर बसला आहे. यादरम्यान मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक या गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले आहे. बुमराह तंदुरुस्त राहिल्यास त्याची, शमी आणि सिराजची संघात निवड होणे जवळपास निश्चित आहे. तसेच प्रसिद्ध कृष्णाही निवडकर्त्यांच्या नजरेत असणार आहे. याशिवाय अर्शदीप, उमरान, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि कुलदीप सेन यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
फिरकीपटूंवर राहणार मोठी जबादारी
भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचे महत्व मोठ्या प्रमाणावर वाढते. येथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांप्रमाणे फिरकीपटूंनाही चांगली साथ देतात. एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असून, त्यात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अशा स्थितीत युझवेंद्र चहल आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव यांची संघातील निवड जवळपास निश्चित झाली आहे. कुलदीप सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याचबरोबर चहलही संघासाठी वेळोवेळी फायदेशीर ठरत आहे. याशिवाय रवी बिश्नोई यांच्यावरही निवडकर्त्यांच्या नजरा असणार आहेत.