रवींद्र कदम
कचरा संकलनातून अधिकाऱ्यांची दुकानदारी
नगर – स्वच्छ भारत स्पर्धेत क्रमांक मिळविण्यासाठी महापौरासह महापालिका आयुक्तांनी कंबर कसली असून सध्या शहरात स्वच्छ भारत, स्वच्छ शहर व सुंदर शहर करण्यासाठी शहरात मोठा गाजावाजा सुरू आहे. त्यासाठी कचरा संकलनासाठी पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेला ठेका देण्यात आला.
मात्र शहरात या कचऱ्यावरून महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी आपली वेगळीच दुकानदारी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील हॉस्पिटल, हॉटेलमधील कचरा उचलण्यासाठी चक्क पैसे घेतले जात आहेत. त्यासाठी महिना देखील ठरविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरात सुरू आहे.
महापालिकेत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारालाच अधिकाऱ्याने हॉस्पिटलचा कर्मचारी म्हणून कचरा उचण्यासाठी ठरलेल्या पैशाची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. एका विभागातील अधिकाऱ्याने तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत कार्यालयाच्या परिसरातील एका बाजुला नेले. तुम्ही खूप कमी पैसे देता. इतर हॉस्पिटल व हॉटेलमधील कचरा संकलनासाठी तीन – तीन हजार देतात.
त्यामुळे तुम्ही आम्हाला कमीत कमी दीड हजार रुपये तरी दिले पाहिजे, अशा प्रकारे चक्क दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीलाच या अधिकाऱ्याने महापालिकेत पैसे मागितले. त्यानंतर या प्रतिनिधीने काही हॉस्पिटल व हॉटेलमध्ये चौकशी केली असता महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी कचरा उचलून नेण्यासाठी पैसे घेत असल्याचे सांगण्यात आले. हॉस्पिटल व हॉटेलमधून दररोज तर काही ठिकाणी दरमहा पैसे देण्यात येत आहेत.
मागील तीन वर्षांपासून स्वच्छता सर्वेक्षणातील घसरलेल्या रॅंकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेकडून शहरांमध्ये स्वच्छता विषयक उपाययोजना केल्या जात आहेत. घरोघरी कचरा संकलन व वाहतूकीसाठी स्वयंभू मार्फत कचरा संकलनाचे कामे जोरात सुरु आहे. तसेच प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी शासनाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे. सर्वेक्षणातील प्रमुख टप्पा असलेल्या “थ्री स्टार’ रॅंकिंगसाठी उद्या सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे हॉस्पिटल, हॉटेल्स मधील कचरा संकलनासाठी पैसे मागत असल्याचे समोर येत आहे.
नियत स्वच्छ करण्याची गरज
शहर स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी पहिले महापालिका अधिकारी, कर्मचारी यांची नियत स्वच्छ करण्याची गरज आहे. नियतच स्वच्छ नसल्याने शहर स्वच्छ करण्यासाठी केलेले प्रयत्न हे काही उपयोगाचे नसल्याचे बोलले जात आहे.