कृषी विज्ञान केंद्राच्या “कृषिक’ या शेतीविषयक प्रदर्शनाचे गुरूवारपासून आयोजन
बारामती – शारदानगर (बारामती) येथील ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक या शेतीविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ऍग्रीकल्चर ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, इस्त्राईलचे राजदूत डॅन अलुफ या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला आहेत. गुरूवारी (दि. 16) सकाळी नऊ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी ठाकरे हे बारामतीतील अद्ययावत शेती तंत्राची तसेच शेतीच्या नवीन तंत्राचा अवलंब केलेल्या शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करणार आहेत. हे प्रदर्शन 16 ते 19 तारखेपर्यंत आहे.
बारामती तालुक्यात शारदानगर येथे होणारे कृषिक प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. जगभरातील नवनवे तंत्रज्ञान येथील शेतीच्या प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाते. या प्रात्यक्षिकांची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे या प्रदर्शनात करणार आहेत. त्यानंतर येथे आयोजित जाहीर सभेत ते उपस्थित शेतकरी गटांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी सकाळी 8 वाजता शारदानगर येथे महत्वपूर्ण उच्चस्तरीय संशोधक बैठक होणार आहे.
केंद्रीय शेती संशोधन भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. माई, राज्याचे कृषी प्रधान सचिव डॉ. एकनाथ डवले, राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, बायरचे आशिया प्रमुख डॉ. सुहास जोशी, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. ए. के. सिंग, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, राहूरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत, नागपूरच्या म्हापसूचे कुलगुरू डॉ. आशिष पाथुरकर यांच्यासह राज्य व देशातील 100 हून अधिक संशोधक या बैठकीत सहभागी होणार आहेत.
यांचा होणार मिलाफ
कृषिक या शेतीविषयक प्रदर्शनामध्ये यंदा अनोखा मिलाफ दिसून येणार आहे. सद्यपरिस्थितीत शेतीविषयक विविध समस्या असून या समस्यांचे निराकरण करावयाचे असेल तर राज्यकर्ते शेतीविषयक शास्त्रज्ञ तसेच शेतीविषयक पॉलिसी मेकर आणि शेतकरी यांचा मिलाफ होणे गरजेचे आहे. या जाणिवेतूनच यंदाच्या कृषिकमध्ये राज्यकर्ते संशोधक व शेतकरी यांचा मिलाफ घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.