मुंबई – एकदिवसीय संघाच्या नेतृत्वावरून हटवले गेल्यानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषद धेत बीसीसीआय व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर जाहीर टीका केली होती. यामुळे गांगुली खूपच संतप्त झाला होता व त्याचवेळी कोहलीला कारणे दाखवा नोटीसही देणार होता. मात्र, बीसीसीआयमधील अन्य सदस्यांनी गागुंलीला रोखले. असा धक्कादायक खुलासा समोर आला असून यावर दुजोरा देण्यास बीसीसीआयच्या सूत्रांनी नकार दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हापासून या सर्व वादांना सुरुवात झाली. त्याला एकदिवसीय व कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहायचे होते, पण बीसीसीआयला मर्यादित षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. त्यामुळे कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी त्याला कर्णधारपद सोडू नको असे सांगितले होते असा दावा केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बीसीसीआयकडून गांगुली यांनी किंवा अन्य कोणीही आपल्याशी कुठलाही संवाद साधला नव्हता. कर्णधारपद सोडू नकोस, असेही कोणी सांगितले नव्हते, असे थेट बोलल्याने गांगुली दुखावला होता व याच संतापाच्या भरात तो कोहलीला कारणे दाखवा नोटसही बजावणार होता.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जे यापूर्वी कधीही घडले नव्हते ते घडणार होते आणि ते पाऊल गांगुली उचलणार होते. मात्र, वाद आणखी वाढला असता, म्हणून बीसीसीआय सदस्यांनी गांगुलीला रोखले. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेआधी कर्णधाराला कारणे दाखवा नोटीस बजावणे योग्य ठरले नसते.