मुंबई – सातत्याने अपयशी कामगिरी करत असलेल्या चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना येत्या काही दिवसांत बीसीसीआय केंद्रीय करार पद्धतीतून डच्चू दिला जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रहाणे आणि पुजारा सातत्याने सुमार कामगिरी करत आहेत. मात्र, तरीही त्यांना सातत्याने संघात स्थान दिले जात आहे. यावर प्रचंड टीका सुरू आहे. यातून बोध घेत अखेर बीसीसीआयने त्यांना केंद्रीय करार पद्धतीतून वगळण्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. या दोघांसह लोकेश राहुल आणि ऋषभ पंतबाबतही धक्कादायक निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
केंद्रीय करारात चार गट असून अ प्लस, अ, ब आणि क आहेत. या गटातील खेळाडूंना दरवर्षी अनुक्रमे सात, पाच, तीन व एक कोटी रुपये दिले जातात. केंद्रीय कराराचे नूतनीकरण करताना बीसीसीआयचे तीन अधिकारी, निवड समितीचे पाचही सदस्य आणि मुख्य प्रशिक्षक हे या कराराच्या आराखड्याला मंजुरी देतात. तसेच त्यात काही बदल सुचवतात.
या चार खेळाडूंसह हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार यांच्याबाबतही ठोस निर्णय घेतला जाणार आहे. त्याचवेळी शार्दुल ठाकूर, महंमद सिराज, शुभमन गिल व हनुमा विहारी यांना उच्च गटात सामावून घेतले जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
सध्याच्या करार पद्धतीतील खेळाडू
अ प्लस – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
अ – रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, महंमद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या.
ब – वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मयंक आग्रवाल
क – कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्सर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, महंमद सिराज