मुंबई – घुसखोर बांगलादेशींना बनावट भारतीय ओळखपत्रं बनवून देणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एटीएसने आठ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध सरकारी कार्यालयांचे बनावट रबराचे शिक्के, बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
अक्रम शेख, मोहम्मद रफीक शेख, अविन केदारे, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल खैर समसुलहक शेख, अबुल हाशम ऊर्फ म्हामून काशम शेख, इद्रिस मोहम्मद शेख, नितीन राजाराम निकम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक, मोहम्मद इद्रीस, अवीन केदारे, नितीन निकमसह आठ जणांची टोळीने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सुमारे 85 बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिली.
तसेच अनेक भारतीयांना देखील बनावट कागदपत्र्यांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिले आहेत. त्यांच्याकडून रबरी शिक्के, महत्वाची कागदपत्रे, प्रिंटर्स, मोबाईल फोन, भारत सरकारचे कोर्ट फी स्टॅंप असा बनावट ओळपत्र बनवण्याच्या साहित्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या बनावट ओळखपत्र निर्मिती प्रकरणात अक्रम शेख, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल शेख, अबुल हाशम अशा एकूण 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.