नारायणगाव(प्रतिनिधी) – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ शांततेच्या घोषणेत भावनिक होत घरगुती व मंडळाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यंदा करोना परिस्थितीमुळे शासनाने दिलेल्या नियमांनुसार गणेश भक्तांनी मूर्तीचे विसर्जन केले.
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसर्जनासाठी असलेल्या ३० मंडळांनी आज साधेपणाने विसर्जन केले. यंदा पोलीस विभागाने नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचातीच्या माध्यमातून ५ व्या दिवशी विसर्जन करण्याचे आवाहनानुसार २९ सार्वजनिक मंडळांनी विसर्जन केले. ७ व्या दिवशी ३१ गणेश मूर्तीचे विसर्जन झाले . व १० व्या दिवशी ३० व सार्वजनिक १ हजार ६०० घरगुती मंडळाचे विसर्जन झाले तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अनुचित प्रकार न घडता गणरायाचे शांततेत व नियमानुसार विसर्जन झाले असून गणेश भक्तांनी केलेल्या सहकार्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी झाला होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
आज १० व्या दिवशी नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतीने सहा वॉर्डात कृत्रिम हौद तयार करून गणेश मूर्तीचे विधिवत पूजा करून हौदमध्ये विसर्जन केले. विसर्जसाठी दरवर्षी लहान मुले व युवकांमध्ये मोठ्या प्रमाणांत उत्साह असतो पण यंदा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ५ पेक्षा जास्त जणांनी न येता साध्या पद्धतीने विसर्जन केले . लहान मुले व युवकांमध्ये उत्साह नव्हता.
सरपंच योगेश पाटे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, उपसरपंच सारिका डेरे ,संतोष दांगट ,अरिफ आतार ,राजेश बाप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मीनानदी तीरावर विसर्जनाची तयारी ग्रामपंचायतीने केली होती. वारूळवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती असल्याने कर्मचाऱ्यांनी विसर्जनाचे नियोजन केले होते .