नीरा(प्रतिनिधी) – पुरंदर तालुका व खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीकाठावरील दत्त घाटावर दोन्ही तालुक्यातील भक्त गणेश विसर्जन करीत असतात. मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे इथे विसर्जन होत असते. यामुळे नदी प्रदूषित होऊ नये म्हणून निरेतील तरुणांनी आज येथे मूर्तिदान व निर्माल्य दान हा उपक्रम राबवला.
नीरा नदीमध्ये दरवर्षी दत्तघाटावर हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. पुरंदर तालुक्यातील नीरा व परिसर तसेच खंडाळा व फलटण तालुक्यातील लोणंद, पाडेगाव या परिसरातून इथे गणेश मूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करत असतात.यामुळे नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असते. गणेश मूर्तींना देण्यात आलेला कृत्रिम रंग व प्लास्टर ऑफ पॅरिस यामुळे जलप्रदूषण होऊन जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. त्याच बरोबर नीरा नदीच्या पाण्याचा उपयोग अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना चालवण्यासाठी ही होत असतो.
सामाजिक उपक्रम राबवण्यात निरेतील तरुणाई नेहमीच आग्रेसर असते.मुलांनी राबवलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमामुळे निश्चितच आपण काही प्रमाणात होणारे जल प्रदूषण रोखु शकलो आहे. उपलब्ध पाण्याचे स्रोत आपण स्वच्छ ठेवायला हवेत.त्यामुळे या तरुणांनीच काम कौतुकास्पद आहे.
– अंकुश माने, पोलीस निरीक्षक, जेजुरी
हा जलास्रोत खराब होऊ नये म्हणून नीरा येथील तरुण योगेश घुले, आदित्य सूर्यवंशी, मनोज पोमण , मनोज सारवाड, सनी दळवी, सूरज कोरडे , अभिलाष संकपाळ, सूरज आतार ,जयेश आधटराव, प्रतीक महामुनी, मंगेश धमाळ, अनिकेत सोनावणे,सलमान सय्यद, आकाश नागे, अभिषेक निगडे, प्रज्योत शहा, यांनी नदी संवर्धन उपक्रमाअंतर्गत प्रदूषण व विटंबना मुक्त गणेश विसर्जन हा उपक्रम राबवला. याला लोकांनी उस्पूर्त प्रतिसाद दिला. आज दुपार पर्यंत लोकांनी सुमारे ७०० गणेश मूर्ती दान केल्या. तर एक टन निर्माल्य दान केले. तरुणांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.