श्रीपाल सबनीस ः खादी ग्रामउद्योग व शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन
सोरतापवाडी- महात्मा गांधींचे विचार हे खेडे विकसित करून देशाचा विकास करण्यावर होते, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय बहुउद्देशीय खादी ग्रामउद्योग व शिक्षण संस्था गेली पंचवीस वर्षे झटत आहे. त्यांचे हे कार्य निश्चित कौतुकास्पद आणि इतरांनी आदर्श घेण्यासारखे आहे, असे प्रतिपादन 89 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
भारतीय बहुउद्देशीय खादी ग्रामउद्योग व शिक्षण संस्था विदर्भ मराठवाड्यामध्ये गेली पंचवीस वर्षे ती कार्य करत आहे. त्या कार्याचा व्याप पश्चिम महाराष्ट्रात करण्यासाठी त्यांनी पुणे येथे विभागीय कार्यालय सुरू केले आणि या कार्यालयाचा भार प्रकाश जगताप यांच्यावर सोपवला. त्यांच्या माध्यमातून दौंड तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही भागांत चांगल्या पद्धतीचे काम सुरू आहे. या संस्थेचा आज 25 वा वर्धापन दिन पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे माजी उपमहापौर आणि त्रिदल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. स तिष देसाई हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव होले याशिवाय ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंतराव जगताप, डॉ. मणीभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, माजी उपाध्यक्ष शरद वनारसे, संचालक भाऊसाहेब कांचन, जनार्दन गोते, अमित खंडाळे, दत्तात्रय लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पुणे विभागामध्ये कार्यरत असलेल्या वासुंदे दौंड कुरकुम या गावांमधील सहभागी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.