नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी चार महिन्यांच्या अभियानाची सुरुवात केली. बुधवारी देशभरातील नेत्यांनी पदयात्रा काढत आणि सार्वजनिक कार्यक्रमातून या चार महिन्यांच्या अभियानाचा प्रारंभ केला.
भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी ‘गांधी संकल्प यात्रे’त सहभागी होऊन पदयात्रा काढली. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
पंतप्रधानांन नरेंद्र मोदींनी एकदाच वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याचे पालन करावे असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. गांधीजीनंतर स्वच्छतेला जनआंदोलन करणारे एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असल्याचेही शहा यांनी सांगितले. भाजप नेते, खासदार, आमदार, संघटनात्मक नेते आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी 2 किमी लांबीची पदयात्रा काढली आणि देशभरात आयोजित कार्यक्रमांमधून अहिंसा, शांतता, खादीचा वापर आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त मोदींनी आपल्या पक्षाला हा दिवस संस्मरणीय बनवण्याचे आवाहन केले होते आणि आपल्या नेत्यांना दिवस साजरा करण्यासाठी पदयात्रेसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले होते. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील भाजप सरकारने या दिवसाचे औचित्य साधून विधानसभेचे 36 तासांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे.