अनंत अडचणींवर मात करीत प्रशासकीय यंत्रणा नियोजितस्थळी डेरेदाखल
जिल्हा प्रतिनिधी
पुणे- शनिवार-रविवारच्या सुट्टीसह मतदानासाठी सोमवार (दि, 21) ची जोडून आलेली सुट्टी… मतदान याद्यांमधील घोळ आणि मतदानकेंद्रांमध्ये ऐनवेळी केलेले बदल…आणि त्याबरोबरच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला परतीचा मान्सून पाऊस अन् त्यात पुढील 24 तास दमदार पाऊस बरसण्याचा अंदाज… यामुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी घसरली, तर निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो त्यामुळेसोमवारी मतदान असल्यामुळे प्रशानाच्या वतीने रविवारी (दि. 20) तयारी केली जात आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर बाबी सोपवण्यासाठी निवडणूक साहित्य वाटप केंद्रात बोलावण्यात आले होते. पण त्याही ठिकाणी मोठ्याप्रमाणात चिखल झाला असून पाणीही साचले होते.
मात्र, याची तमा न बाळगाता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिखल तुडवत लोकशाहीचा उत्सव उत्स्फूर्तपणे साजरा करण्यासाठी कंबर कसली अन् जो-तो आपआपले साहित्य घेण्यासाठी आगेकुच करीत होता. या कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांची प्रेरण घेऊन प्रशासनही जोमाने कामाला लागले अन् कसलीही तमा न बाळगता सर्वजण आपल्या लवाजम्यांसह इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्गस्थ झाले व सायंकाळी उशीरपर्यंत आपल्या नियोजितस्थळी डेरेदाखल झाले. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रेरणा घेत सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे हा लोकशाहीचा उत्सव बळकट करण्यासाठी सोमवारी (दि. 21) मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन दैनिक “प्रभात’च्या वतीने तमाम मतदारांना करण्यात आले आहे.
- …तर मतदाचा हक्काला मतदार मुकणार
मतदार याद्यांमध्ये यंदा अनेक घोळ असल्याचे आढळून आले आहे. अनेक मतदारांची नावे त्यांच्या नेहमीच्या मतदारसंघांऐवजी अन्यत्र यादीत असल्याचे आढळून आले आहे. वेबसाइट-ऍपवर तपासल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे मतदान कसे करायचे, हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे. तसेच सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याच्या धोरणामुळे पूर्वीच्या अनेक मतदान केंद्रांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे अनेक मतदान केंद्रे दोन-तीन किलोमीटरपेक्षाही अधिक दूरवर गेली आहेत. मात्र, घरी आलेल्या मतदान स्लिपांमध्ये तर जुन्याच केंद्रांचे उल्लेख आहेत. त्यामुळे मतदारांचा संभ्रम वाढला असून, योग्य माहिती न मिळाल्यास अनेकांना मतदानाचा हक्क बजाविणे शक्य होणार नाही, अशी भीती आहे.