संगमनेर – दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बारा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक झाल्यानंतर त्यातील फरार असलेल्या पाचव्या संशयीतालाही रविवारी अटक करण्यात आली आहे. सुमीत डुकरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. हा प्रकार दहा कोटीच्या खंडणीसाठीच झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे. याबाबत पोलिसांच्या हाती अद्याप ठोस काही लागलेले नाही.
संगमनेरातील प्रसिद्ध कापड व्यापारी प्रकाश कटारिया यांचा बारा वर्षीय नातू दक्ष याचे शुक्रवारी त्याच्या राहत्या घरापासून अपहरण करण्यात आले होते. त्याचे अपहरण झाल्याचे उघड होताच संगमनेर शहर पोलीस व नगरच्या स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेत अवघ्या दहा तासात अपहृत दक्ष कटारियाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.
त्याच दिवशी नगरच्या गुन्हे शाखेने पाठलाग करीत स.म.भाऊसाहेब थोरात कारखान्यासमोरुन दुचाकीवरुन पळून चाललेल्या जनार्दन खंडू बोडखे, सचिन पोपट लेवे, मयुर उर्फ पंकज प्रकाश उदावंत व या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विरेश श्यामराव गिरी यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र वारंवार ठिकाण बदलणे व मोबाईल बंद ठेवण्याच्या त्याच्या कृतीमुळे गेले दोन दिवस तो तपास पथकाला गुंगारा देत होता.
अखेर रविवारी या प्रकरणातील पाचवा संशयीत सुमीत डुकरे हा नारायणगाव (जि.पुणे) येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने संगमनेर पोलिसांनी तेथे धाव घेत सापळा लावला त्यात पसार असलेला संशयीत अलगद अडकला. त्याला ताब्यात घेत संगमनेरात आणण्यात आले. चौकशीत त्याने या प्रकरणात आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आज दुपारी त्याला संगमनेरच्या न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.