महाबळेश्वर – मुलांना मारहाण करून पळवून नेण्याच्या तयारीत असणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळीला शनिवारी महाबळेश्वर पोलिसांनी गजाआड केले. मुलांच्या आरडाओरडा केल्यामुळे व नागरिकांच्या जागरुकतेमुळे पुढील अनर्थ टळला. मुले पालकांच्या ताब्यात सुखरूप असून या पर्यटनस्थळी वाढत्या प्रमाणात येणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळ्यांना महाबळेश्वरमध्ये येण्यास पायबंद घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
नागरिक व महाबळेश्वर पोलीस ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी की शनिवारी दि. 7 रोजी दुपारी 12.15 च्या सुमारास येथील बौद्धवस्तीच्या परिसरात सात ते दहा वयोगटातील काही मुले खेळत होती. त्यावेळी तेथून जात असलेल्या लक्ष्मण शंकर क्लेमोर (वय 50), बसुराज सायाप्पा कडमिची (वय 25) व रमेश सिद्धराम टेकुल (वय 28, सर्व रा. यलम्मा पेठ, कौतम चौक सोलापूर, सध्या रा. शेडानगर, चेंबूर, मुंबई) या तीन तृतीयपंथीयांच्या टोळीने मुलांना मारहाण करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
मुलांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांच्या मदतीने मुलांनी सुटका करून घेतली. या झटापटीत मुलांना जखमा झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. घाबरलेल्या मनस्थितीतच मुलांच्या पालकांनी येथील पोलीस ठाण्याकडे तातडीने धाव घेतली व या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली.
पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने या तृतीयपंथी टोळीचा शोध घेतला असता वरील तिन्ही संशयित महाबळेश्वर बस स्थानक परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या तिघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. महाबळेश्वर पोलिसांनी मुलांचा व पालकांचे जाबजबाब घेऊन तिन्ही तृतीयपंथीयांच्या विरुद्ध भादविसं कलम 363, 323, 511, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली आहे. पुढील तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभौरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा चव्हाण करीत आहेत.