वाई – वाई नगरपालिकेमार्फत करवसुलीसाठी शहरात नळ कनेक्शन बंद करण्याची व जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आजअखेर पाच लाख 54 हजार 500 रूपये पाणी कर महसूल पालिकेकडे जमा झाला आहे.
वाई नगरपालिकेच्या करवसुलीबाबत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी करवसुलीबाबत आढावा बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस सहाय्यक करनिरीक्षक व भाग लिपिक उपस्थित होते. बैठकीत मुख्याधिकाऱ्यांनी थकीत कराबाबत जप्ती व नळ कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाई शहरातील थकबाकीदारांची नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. कारवाईदरम्यान थकबाकीदार नळ कनेक्शनधारकांना नोटीस देण्यात आली होती. अशा काही नळ कनेक्शनधारकांनी मागणी केलेली देय रक्कम भरून नळ कनेक्शन बंदची कारवाई टाळली.
परंतु, ब्राम्हणशाही, रामडोह आळी भागातील प्रताप बाजीराव भिलारे, अनिल मारूती शेंडे, उमेश वसंत सुरशे, सिध्दनाथवाडी भागातील काही जणांना वारंवार सूचना नोटीस देऊनही पाणीकराचा भरणा करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले. या कारवाईमुळे आजअखेर एकूण मिळून पाच लाख 54 हजार 500 रूपये पाणी कर महसूल जमा झाला. तसेच यापुढे देखील वाई शहरातील इतर थकबाकीदारांच्या नळकनेक्शन बंद करण्याची व जप्तीची कारवाई सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी पोळ यांनी सांगितले. नागरिकांनी थकीत करांचा भरणा तात्काळ करून जप्तीची कटू कारवाई टाळावी व नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.