नवी दिल्ली – जी-20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्ली सज्ज आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “भारत मंडपम्’ची सजावट करण्यात येत आहे. या मेगा इव्हेंटमध्ये परदेशी पाहुण्यांना भारतीय वैदिक कालखंड आणि भारताचे संविधान बनवण्याची प्रक्रिया आणि भारत मंडपममधील त्याची वैशिष्ट्ये याबद्दल देखील सांगितले जाईल. देशाच्या प्राचीन इतिहासासोबतच डिजिटल जगाची झलकही येथे मांडण्यात येणार आहे.
जी-20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. जी-20 साठी भारत मंडपममध्ये 26 एलसीडी पॅनल्सची डिजिटल भिंत बांधली जाईल. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत एआय (AI) अँकर करतील. याशिवाय, एआय अँकर कॉरिडॉरच्या थीमबद्दल देखील माहिती देईल. भारतीय लोकशाहीची कहाणी या पटलावर दाखवण्यात येणार आहे. तसेच, वैदिक काळापासून 2019 च्या निवडणुकीपर्यंतची झलकही सादर केली जाईल. पॅनेलमध्ये टच स्क्रीन असेल, जिथे 16 भाषांमध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूर असेल. ऑडिओचा कालावधी 60 सेकंद असेल.
या पडद्यांवर वैदिक कालखंडासह सम्राट अशोक, फा-हियान, मेगास्थिनीस यांचे म्हणणे आणि उत्तरमेरूर, कृष्णदेव राय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची माहिती दिली जाईल. विसाव्या शतकातील लोकशाहीची कहाणी, संविधान बनविण्याची प्रक्रियाही यामध्ये दाखवण्यात आली आहे. एवढेच नाही तर सिंधू संस्कृतीचे वर्णनही त्यात समाविष्ट केले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या डेटाद्वारे, देशातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांबद्दल माहिती दिली जाईल. ही माहिती 2019 पर्यंतची असेल. या माध्यमातून भारतीय लोकशाहीच्या जुन्या आणि सखोल परंपरेची कहाणी दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबतच इंडिया ऑन द मून हा साडेचार मिनिटांचा चित्रपटही भारत मंडपममध्ये सादर होणार आहे.